उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार : सोमय्या

मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (08:24 IST)
ठाकरे सरकारच्या बेनामी कारभारात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव आहे.त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे १९ बेनामी बंगले आहेत.त्यामुळे ठाकरे सरकार बेनामी सरकार आहे. त्यांचं इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार असल्याचा असा इशारा भाजप नेते किरिट सोमय्या यांनी दिला.परिवहन मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
 
परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आरटीओ अधिकारी खरमाटे यांच्या सांगलीमधील मालमत्तांची सोमय्या यांनी पाहणी केली.त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.बजरंग खरमाटे यांचा पगार ७० हजार असताना त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली,असा सवाल सोमय्यांनी केला.सोन्या-चांदीची दुकानं,प्रथमेश पाईप फॅक्टरी खरमाटेंची आहे.प्रथमेश त्यांच्या मुलाचं नाव असून, त्याच्या नावाने अनेक उद्योग आहेत. अनिल परब यांच्या सचिवाची एवढी संपत्ती असेल तर खुद्द परबांची किती,असा सवालही सोमय्यांनी केला.
 
आम्ही ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा.अनिल परब प्रकरण आता सुरु आहे,भावना गवळी पुढच्या आठवड्यात आणि जितेंद्र आव्हाड,तुम्हीही बॅगा भरा,असा थेट इशाराच सोमय्यांनी दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती