विनोद तावडे म्हणतात....तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही सोबतच घेतले नसते

शनिवार, 16 डिसेंबर 2023 (21:34 IST)
उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली नसती तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही सोबतच घेतले नसते. मात्र राज्यात आता महायुती असल्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार असून राज्यातील 48 पैकी 45 पेक्षा अधिक जागेवर विजयी होऊ, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने तावडे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत गद्दारी केल्यामुळे एकनाथ शिंदे त्यातून बाहेर पडले. शिंदे फडणवीस सरकार राज्यात असतानाच अजित पवार आमच्यासोबत आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर आज अजित पवार यांना सोबत घेतले नसते. महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढणार असून या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णयही सामूहिकरित्या घेण्यात येईल. भाजपने 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलविली असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्य लोकसभेच्या चारशे जागांचे आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती