शिक्षण विभागात दररोज नवनवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. प्राथमिक शिक्षण विभागात शालार्थ आयडी घोटाळा चर्चेत आहे, तर उच्च माध्यमिकमध्येही अशाच एका घटनेची चर्चा आहे. अकरावी आणि बारावीच्या शिक्षकांच्या मान्यतेशी संबंधित 45 फायली गायब आहेत. यामुळे विभागात खळबळ उडाली आहे आणि या फायली बनावट शिक्षकांशी संबंधित असल्याची चर्चा आहे.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त हे एसआयटीचे प्रमुख आहेत आणि ते इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांच्या मान्यता तसेच आवश्यक कागदपत्रांची चौकशी करतील. विनाअनुदानित ते अनुदानित शिक्षकांमध्ये बदली झालेल्या शिक्षकांचीही चौकशी केली जात आहे.
अकरावी आणि बारावीच्या शिक्षकांना बेकायदेशीर मान्यता देऊन शालार्थ आयडी मंजूर केल्याबद्दल चिंतामण वंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता एसआयटी याची चौकशी करणार असल्याने उपसंचालक कार्यालयात बराच गोंधळ उडाला आहे. अकरावी आणि बारावीच्या शिक्षकांशी संबंधित 45 ते50 फायली दिसत नसल्याची चर्चा विभागात होत आहे.