'ईडीला घाबरून कुणीही आमच्याकडे येऊ नका'

रविवार, 31 जुलै 2022 (19:04 IST)
अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) चौकशांना घाबरून कुणीही आमच्याकडे (शिंदे गट किंवा भाजप) येऊ नका, असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये केलं. पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "केंद्रीय तपासयंत्रणांनी सूडानं काम केलं असतं, तर न्यायालयानं कारवाई झालेल्यांना दिलासा दिला असता. सूडाच्या कारवाईची आवश्यकता काय? एवढं मोठं सरकार बनवलं, एकतरी सूडाची कारवाई केली का? एकानं तरी सांगितलं का, की ईडीची नोटीस पाठवली म्हणून तिकडे गेलो?"
 
"ईडीच्या भीतीनं कुणीही इकडे येऊ नका. दडपणाखाली येऊ नका," असंही शिंदे म्हणाले.  ते म्हणालेत ना, कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. चौकशीला सामोरं जाऊद्या. त्यातून पुढे येईल ते कळेलच."
 
"भाजपमध्ये जाणार नाही म्हणतात, पण त्यांना कुणी निमंत्रण दिलंय का?" असा टोलाही एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना लगावला.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
 
आज त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आढावा घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे जाहीर सभेला संबोधित केलं .
 
त्यानंतर ते रात्री साडे आठच्या सुमारास औरंगाबादला पोहचले आणि तिथून थेट दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती