सत्तास्थापनेची आम्हाला कोणतीही घाई नाही, सरकार कोसळल्यावर पाहू

सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (08:36 IST)
शिवसेनेबरोबर राज्यात सरकार स्थापनेची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत  सांगितल आहे. ‘सत्तास्थापनेची आम्हाला कोणतीही घाई नाही, सरकार कोसळल्यावर पाहू, ‘असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.
 
फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी भेट झाली होती. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी नवीन राजकीय समीकरणे जुळविली जाणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 
 
यासंदर्भात फडणवीस म्हणाले, ही भेट मुलाखतीसंदर्भातच होती आणि शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. हे सरकार पाडण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या कृतीतूनच पडेल,असा मला विश्वास आहे. सरकार पडल्यावर काय करायचे ते पाहू. भाजप विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती