नाशिक - समान नागरी कायदा सर्वांसाठी महत्वाचा , डाॅ. नीलम गोऱ्हे यांचे मत

शुक्रवार, 14 जुलै 2023 (21:35 IST)
समान नागरी कायदा सर्व धर्मातील स्त्री-पुरूषांसाठी दत्तक विधान, मालमत्ता, विवाह यादृष्टीने महत्वाचा आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या उपनेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते, त्यानुसारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करीत असल्याने शिंदे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी डाॅ. गोऱ्हे नाशिक दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
 
उध्दव ठाकरे यांनी समान नागरी कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यासंदर्भात त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली असता त्यांनी कायद्याचा अंतिम मसुदा आल्यावर बोलू, असे सांगितले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याविषयी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली होती, याकडे डाॅ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.
 
महाविकास आघाडी असताना शिंदे गट हा अजित पवार यांच्या कार्यशैलीने त्रस्त होऊन भाजपकडे गेला. आता अजित पवारच भाजप-शिंदे यांच्यासोबत आले. शिंदे हे बेरजेचे राजकारण करीत आहेत. सत्ता एक साधन आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने आमदार अस्वस्थ असले तरी राजकारणात प्रत्येकाची तयारी असते, असे गोऱ्हे यांनी नमूद केले. शिंदे गटात गेल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकचा दौरा झाला. गोऱ्हे यांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. त्याविषयी लोकशाही असून प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती