नागरिकांनी सहकार्य न केल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय !

शनिवार, 27 मार्च 2021 (09:00 IST)
नाशिक  जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता साधारणतः एक आठवडा निर्बंध यांची सक्त अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असून या परिस्थितीत  नागरिकांनी सहकार्य न केल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते.
 
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून मागील वर्षापेक्षा बिकट परिस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यासाठी पोलिसांनी निर्बंधांचे अंमलबजावणीमध्ये सक्रिय रित्या सहभागी होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे, अशा सूचना पालकमंत्री  भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
 
खाजगी डॉक्टर्स व लॅब यांनी महानगरपालिका व पोलिस यंत्रणांना गृहविलगीकरणातील रूग्णांची दैनंदिन माहिती कळविल्यास गृहविलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या रुग्णांवर महानगरपालिका व पोलिस यंत्रणेने एकत्रितपणे कारवाई करावी. तसेच खाजगी डॉक्टर्सनी गृहविलगीकरणातील रुग्णांना आवश्यक त्या सुविधा आहेत किंवा कसे याबाबत देखील तपासणी करण्याची जबाबदारी पार पाडावी. त्याचप्रमाणे गृहसोसायटीच्या चेअरमन यांनी देखील आपल्या सोसायटीत गृहविलगीकरणात असलेल्या व कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रशासनाला कळविण्यात यावी, असे आवाहन देखील पालकमंत्री  भुजबळ यांनी केले आहे.
वाढती रुग्णसंख्या पाहता कोविड केअर सेंटर्ससाठी हॉटेल्स अधिग्रहित करण्यात यावेत. तसेच ९५ ते ११० मेट्रिक टन ऑक्सिजनची दररोज निर्मीती करण्यात येत असल्याने जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे. त्यामुळे शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळे आणणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्री  भुजबळ यांनी दिले आहेत.
 
त्याचप्रमाणे जिल्ह्यात साधारण तीन लाख लसीकरणाचे डोस प्राप्त झाले असून त्यापैकी दोन लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात 151 लसीकरण केंद्र सुरू असून 26 लसीकरण केंद्र नव्याने सुरू करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी  मांढरे यांनी पालकमंत्री यांना बैठकीत सादर केली.
 
या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी संक्रमण क्षेत्रांमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधाची अतिशय कठोर काटेकोर अंमलबजावणी कनिष्ठ कर्मचारी यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या मार्फत प्रभावीपणे करून घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यांना दिले.
 
शहरांमधील हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या बेडची माहिती नागरिकांपर्यंत हेल्पलाईन द्वारे तसेच ऑनलाइन पोर्टलद्वारे वेळोवेळी पोहोचवण्यात येईल. तसेच लवकरच किमान एक हजार बेडने हॉस्पिटल क्षमता वाढवण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती