उत्तर प्रदेशच्या न्यायव्यवस्थेने अखेर दोन दशक जुन्या एका भयानक गुन्ह्यावर निकाल दिला आहे. लखनऊच्या एडीजे कोर्टाने सोमवारी कुख्यात गुन्हेगार राम निरंजन उर्फ राजा कोलंदर आणि त्याचा मेहुणा वक्षराज कोल यांना दुहेरी हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे प्रकरण २००० मध्ये लखनौच्या नाका परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आहे, ज्याने त्यावेळी संपूर्ण राज्याला हादरवून टाकले होते.
मिळालेल्या माहितनुसार राजा कोलंदरवर २० हून अधिक लोकांच्या हत्येचा आरोप आहे. तसेच, पुराव्याअभावी त्याला अनेक प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. पण यावेळी न्यायालयात जमलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. कोलंदरच्या अटकेनंतर उघडकीस आलेल्या खुलाशांमुळे लोक घाबरले. प्रयागराज येथील त्याच्या फार्महाऊसमधून अनेक मानवी कवट्या आणि सांगाडे सापडले. पोलिस तपासात असे दिसून आले की तो स्वतःला तांत्रिक मानत होता, त्याला मानवी कवटीचे सूप बनवून ते पिण्याची विचित्र सवय होती. हत्येनंतर तो मृतदेहाचे तुकडे करायचा आणि डोके स्वतःकडे ठेवायचा आणि विचित्र विधी करायचा. न्यायालयाने कोलंदर आणि वक्षराज यांना २२ वर्षीय मनोज कुमार सिंग आणि त्याचा ड्रायव्हर रवी श्रीवास्तव यांचे अपहरण आणि खून केल्याबद्दल दोषी ठरवले. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, दोघांनाही बोलावण्यात आले आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
सरकारी वकील यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही दोषींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३६४, ३९६, २०१, ४१२ आणि ४०४ अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये खुनाच्या उद्देशाने अपहरण, खून करून दरोडा, पुरावे नष्ट करणे, चोरीच्या मालमत्तेचा ताबा घेणे आणि मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा गैरवापर करणे यासारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे.