‘‘आठव्या ज्युनियर आशिया चषकावर भारताने नाव कोरल्याचा आनंद आहे. प्रत्येक सामन्यागणिक आमची कामगिरी उंचावली. ज्युनियर संघासाठी आम्ही तयार केलेला आराखडा योग्य आहे, हे या जेतेपदातून दिसून येत आहे, ’ ’ असे हरेंद्र सिंग यांनी ‘पीटीआय’ ला दूरध्वनीवरून सांगितले. एका जेतेपदाच्या आधारे हुरळून जाणे योग्य नसल्याचे हरेंद्र सिंग यांचे मत पडले. ‘‘आशिया चषक जेतेपद ही युवा हॉकीपटूंसाठी सुरुवात आहे. भविष्यात युरोपियन संघांविरुद्ध खेळताना त्यांची खरी परीक्षा असेल. केवळ स्पर्धावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. जगभरातील अव्वल संघांविरुद्ध खेळले पाहिजे. पुढील वर्षी जर्मनी, बेल्जियम, इंग्लंड आणि हॉलंडसारख्या संघांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळताना युवा हॉकीपटूंना स्वत:ची क्षमता पडताळून पाहता येईल,’ ’ असे हरेंद्र म्हणाले.
अंतिम फेरीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध कुठलेही दडपण नसल्याचे हरेंद्र सिंग यांनी पुढे म्हटले. ‘‘स्पर्धेतील अन्य लढतींप्रमाणेच ‘फायनल’ मध्ये आम्ही खेळलो. दडपणाचा काही प्रश्नच नाही. नैसर्गिक खेळ करा, असे मी आपल्या हॉकीपटूंना सांगितले. प्रतिस्पध्र्याच्या कमकुवत बाबी हेरून आम्ही अप्रतिम खेळ करताना जेतेपदाला गवसणी घातली. ‘डड्ढॅगफ्लिकर’ हरमनप्रीत सिंग आणि गोलकीपर विकास दहियाने जेतेपदात मोलाचा वाटा उचलला. दोघेही कौतुकास पात्र ठरले. मात्र वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीला मी महत्त्व देतो. हॉकी सांघिक खेळ आहे. त्यामुळे सांघिक कामगिरीवरच सातत्य राखता येते,’ ’ असे ते म्हणाले. पुढील वर्षी मायदेशात होणा-या ज्युनियर वल्र्डकपच्यादृष्टीने आशिया चषक जेतेपद महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. एक ते ११ डिसेंबर २०१६ दरम्यान नवी दिल्लीत ज्युनियर हॉकी वल्र्डकप होईल.
ज्युनियर हॉकीपटूंना प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस ज्युनियर पुरुष आशिया चषक विजेत्या भारताच्या हॉकीपटूंना प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे. हॉकी इंडियातर्फे (एचआय) सोमवारी तशी घोषणा करण्यात आली. हॉकीपटूंसह मुख्य प्रशिक्षकांना तितकेच रकमेचे बक्षीस जाहीर झाले आहे. सपोर्ट स्टाफना बक्षीसाखातर ५० हजार रुपये मिळतील.