हंडाभर पाण्यासाठी इगतपुरीत महिलांची वणवण..

गुरूवार, 11 मे 2023 (07:35 IST)
उन्हाळा म्हटलं कि पाणीटंचाईच संकट डोकं वर काढत. अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. त्याचेच प्रत्यय नाशिक शहरात पाहायला मिळत आहे. नाशिकमधील इगतपुरी तालुक्यात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. एकीकडे नाशिक शहरामध्ये अजून पाणी कपातीची गरज नाही असे शहराचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे नाशिक शहरातील इगतपुरी तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी भटकावं लागत आहे.
 
इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी परिसरातली हि परिस्थिती आहे. इथे पाण्यासाठी महिलांना जंगलातून एक/दोन किलोमीटर अंतर पार करून जावं लागत. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यदृष्टीचा भाग म्हणून इगतपुरी तालुका ओळखला जातो.
 
परंतु ह्याच तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करत फिरावं लागतंय. कृषी विभागाच्या बिरसा मुंडा योजना अंतर्गत या गावात दोन विहिरी बांधण्यात आल्या आहेत पण या विहिरींचं पाणी पिण्यायोग्य नसल्याने पाणी पिल्यानंतर घशाला त्रास होतो, लहान मुलं आजारी पडतात अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना वनवण करावी लागत आहे.
 
शहरात एक दिवस पाणी नाही आलं तरी नागरिकांचे हाल बेहाल होतात. परंतु इथे इगतपुरी तालुक्यातील कुरंगवाडीच्या मारोतीवाडी वस्तीतील महिला रोज पहाटे चार/ पाच वाजता घरातून पाण्यासाठी बाहेर पडतात. चार पाच तासानंतर घरी परत जातात. कपारीतून थेंब थेंब पाणी खाली पडते तेव्हा एखादा हंडा भरण्याएवढे पाणी जमा होते व हंडा भरला जातो.
 
पावसाळ्याच्या चार महिन्यात इथे धो धो पाऊस पडतो. मात्र मार्च महिन्यापासूनच नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती सुरु होते. या गावाचं दोन्ही बाजूला काही किलोमीटर अंतरावरच धरण आहेत. तरी देखील येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करत फिरावं लागत आहे. आता प्रशासन या नागरिकांसाठी काय सोय करेल हे बघणे महत्वाचे ठरेल.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती