केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न असला तरी महाराष्ट्र बेईमान नाही. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो आणि नुसते हल्लेच नाहीत तर याच वास्तूच्या खाली अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत, अशात सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात ठिणगी पडेल असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली असून याला शिवसेनेचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
संजय राऊत यांनी केंद्रीय यंत्रणांचं संकट महाराष्ट्रासह पश्चिम बंगालवर असल्याचं देखील म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की सरकार पडणार नाही असं विधान केल्यानंतर माझ्या जवळपासच्या लोकांवर ईडीचं सत्र सुरु झालं. माझी बँक खाती असलेल्या कार्यालयात ईडीचे लोक गेले. मुलीच्या लग्नात मेहंदी, नेल पॉलिश करणाऱ्यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. तसेच तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील त्यांना देण्यात आली, असं संजय राऊत यांनी सांगितिलं आहे.