राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आमचे काम सुरू आहे – अजित पवार

शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (08:04 IST)
Our work is going on as NCP - Ajit Pawar राज्यातील विकासकामांना सरकारने प्राधान्य दिले असून जनतेच्या समस्या आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावानांही न्याय दिला असून त्यांचे संख्याबळ कमी असले तरी त्यांच्यासोबत कोणताही दुजाभाव केलेला नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, निधीवाटपात कोणताही दुजाभाव करण्यात आलेला नाही असे सांगतानाच, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच काम करत आहोत. माझ्या आमदारांची काळजी कोणी करू नये त्यासाठी मी खंबीर आहे असेही ठणकावले.
 
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विधानभवनातील पत्रकार कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारने सर्वसामान्य जनता आणि शेतक-यांना समोर ठेवून अनेक निर्णय घेतले आहेत. एक रूपयात पिक विमा, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनांबाबत महत्वाचे निर्णय घेतानाच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून वर्गवारीची अट काढून आता ५ लाखांपर्यंत सर्वांनाच मोफत उपचार मिळणार आहे असे सांगतानाच बँकांचे नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांनाही दिलासा दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
राज्याचे उत्पन्न वाढविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, येत्या सोमवारपासूनच त्याबाबतचा आढावा घेण्यास सुरूवात करणार आहे. राज्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. धरणाची परिस्थिती ब-यापैकीपैकी आहे. पण अदयाप पावसाची गरज आहे. पावसाचे अजून दोन स्पेल बाकी आहेत. ऑगस्ट संपेपर्यंत ते होतील. दरम्यानच्या काळात भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या होत्या. पण आता ८० ते ८५ टक्केपर्यंत पेरण्या झाल्याने चित्र बदलेल असे पवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती