मोदी सरकारमुळे 2026 मध्ये आपला देश कर्जात बुडालेला असेल

गुरूवार, 7 मार्च 2024 (08:59 IST)
निवडणुकीत पुन्हा भाजपाला निवडून दिल्यास मोदी सरकारमुळे 2026 मध्ये आपला देश कर्जात बुडालेला असेल. दरम्यान, या कार्यक्रमात वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वंचित आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जगदीश घरत यांच्या समवेत पदाधिकारी यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला. मुस्लिम समाज कार्यकर्ते, मारवाडी समाज, मातंग समाज, आदिवासी समाज बांधवांनी देखील प्रवेश केला.नवी मुंबईच्या नेरुळ येथील रामलीला मैदानात वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन करण्यात आले होते.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी “माझा देश माझा परिवार” हे जे सांगत आहेत ते अत्यंत खोटारडे आहे. दुर्दैवाने विरोधी पक्ष हा मोदींचा खोटारडेपणा उजेडात आणू शकत नाही, अशी टीका करत देशातील आताची परिस्थिती पाहता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. आरएसएस प्रणित मोदी सरकार सर्वसामान्यांना देशोधडीला लावत आहे. रिझर्व बँकेने देश कर्जात बुडाला असल्याचे देखील सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला निवडून दिल्यास मोदी सरकारमुळे 2026 मध्ये आपला देश कर्जात बुडालेला असेल. जर देशाला कर्जात बुडवायचे नसेल तर येत्या निवडणुकीत भारतीय संविधानाला लोकशाहीला उद्याच्या पिढीचे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहन यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती