मुंबईत सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? या बॅनर ची चर्चा

शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (21:27 IST)
मुंबईत लावलेले बॅनर सध्या  सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्या बॅनरवर सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे विधान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे असून, केसरी या त्यांच्या वर्तमानपत्रात त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाची ही हेडलाईन होती. टिळकांचे अग्रलेख हाच ‘केसरी’चा आत्मा असायचा. टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’,अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. आता तोच धागा पकडून मुंबईत हे बॅनर झळकावण्यात आले आहेत. मुंबईच्या माहीम आणि सायन परिसरात सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा आशयाचे होर्डिंग लागले आहेत. पण हे होर्डिंग्स नेमके कोणी लावले, याबाबत काहीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मुंबईत होर्डिंग्स लावण्यामागे काही मार्केटिंगचा फंडा आहे की काय, याबद्दलही काही समजलेले नाही.
 
पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत बांधकामे, आवाक्याबाहेरची गर्दी यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं होतं. आता पावसाळा संपला असला तरी कोणीतरी या बॅनरच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. गेल्या तीन महिन्यांत राज्य सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिलीय. मुंबई महापालिकेत सध्या हुकूमशाही असून केवळ बदल्या, निविदा आणि वेळकाढूपणा चालल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला होता. त्यामुळे शहराचे आणि पर्यायाने मुंबईकरांचे नुकसान होत असून, निधीचीही उधळपट्टी सुरू असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणालेत. मुंबईच्या माहीम आणि सायन परिसरात सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा आशयाचे होर्डिंग्स लावण्यात आलेत. पण हे होर्डिंग कोणी लावले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच यामधून ते लावणाऱ्यांना नेमकं काय म्हणायचंय हेही कळू शकलेले नाही.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती