राज्यात अजूनही पावणेदोन कोटी नागरिक निरक्षर

मंगळवार, 25 जुलै 2023 (08:30 IST)
राज्याच्या शिक्षण संचालनालयाने (योजना) जिल्हानिहाय निरक्षरांची यादी जाहीर केली आहे. नवतंत्रज्ञानाच्या जमान्यात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे प्रयोग होत आहेत. देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असताना त्याच देशात ५ कोटींहून अधिक लोक निरक्षर असून त्यात महाराष्ट्रातीलच पावणेदोन कोटी लोकांचा समावेश आहे. या लोकांना आता काहीही करून २०२७ पर्यंत साक्षर केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे.
 
या अगोदर राज्यातच नव्हे, तर देशभर सारक्षता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला देशात चांगले यश आले होते. मात्र, त्यातूनही अनेकजण शिक्षणाविना राहिले होते. ही संख्या अजूनही मोठी आहे. या निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सध्या सगळीकडे अ‍ँड्रॉईड मोबाईल आहेत. त्यामुळे निरक्षरांना साक्षर करणे अधिक सोपे आहे. त्यामुळे या निरक्षरांना साक्षर करण्यात येणार असून, १० निरक्षरांसाठी एक स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुणांना (किमान आठवी उत्तीर्ण) स्वयंसेवक म्हणून काम करता येणार आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती