“वसुलीसाठी पोलीस वापरता, मग…”; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (08:00 IST)
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला दररोज वेगवेगळं वळण लागताना दिसत आहे. अनेक जणांचं नाव यासंदर्भात जोडलं जात आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दररोज नवनवे आरोप करत अनेकांवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांना भेटल्याचे राणेंनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
 
“ड्रग्ज या राज्यात यायला नको भावी पिढी उद्धवस्त होत आहे. त्यामुळे ड्रग्ज विरोधात कडक कारवाई करणे आणि ड्रग्ज सबंधित लोकांना तुरुंगात टाकण ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार हे करत नाही आहे. ड्रग्ज प्रकरणात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. पण ड्रग्ज बंद करण्यासाठी आम्ही मोहीम सुरु करु, असे मुख्यमंत्री का बोलत नाहीत. त्यांनी कणखरपणे बोलायला पाहिजे. पोलिसांना कामाला लावलं पाहिजे. पोलिसांना तुम्ही वसुलीसाठी वापरता, मग ड्रग्ज राज्यात येत आहे त्याला विरोध करायला का वापरत नाही?”, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
 
“करोना हाताळायला देखील राज्य सरकार कमी पडत आहे. राज्यात बेरोजगारी वाढली. त्यामुळे यावर उपाय केले पाहीजेत फक्त नरेंद्र मोदींवर टीका करुन नाही भागणार. ज्या प्रकारे नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. तुम्हाला साधी मुंबई महानगरपालिका देखील चालवता येत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. हे सरकार काय करत आहे. सरकारमधले मंत्री फक्त लपाछपी खेळत आहेत”, असा निशाणा देखील नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर साधला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती