महाराष्ट्र सरकारमध्ये दत्तात्रेय भरणे हे नवे कृषीमंत्री असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या जबाबदारीबद्दल दत्तात्रेय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दत्तात्रेय भरणे यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी आभारी आहे. राज्याच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो.
ते म्हणाले, मी शेतकरी कुटुंबात जन्मलो आणि वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना, अडचणी आणि अपेक्षा मी मनापासून समजतो. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्याय, हक्क आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा आदर, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य ध्येय असेल. सरकारच्या प्रत्येक धोरणात शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. भरणे यांनी माणिकराव कोकाटे यांची जागा घेतली आहे.तर कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभेत कोकाटे यांनी मोबाईलवर रमी गेम खेळल्याचा व्हायरल व्हिडिओ आणि शेतकऱ्यांविरुद्ध वादग्रस्त विधाने केल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.