उपमुख्यमंत्र्यांकडून बारावी इयत्ता उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (18:43 IST)
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून शिक्षणाचा आनंद घ्यावा. जीवनात यशस्वी व्हावे. देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन करून उपमुख्यमंत्र्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाहून अधिक काळ तणावाखाली वावरावे लागले. तरीही शाळांतर्गत मुल्यांकनात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. 99.81 टक्के निकालासह कोकण विभाग बारावीच्या मूल्यांकनात राज्यात अव्वल ठरला असून अन्य विभागांचा निकाल 99 टक्क्यांहून अधिक लागला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतून 99.63 टक्के विद्यार्थी बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. हे यश कौतुकास्पद असून त्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे मी अभिनंदन करतो. जीवनात येणाऱ्या आव्हानांवर मात करुन हे विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर असंच यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांनी बारावी इयत्ता उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती