अबकी बार भाजप तडीपार, हा आपला नारा असला पाहिजे- उद्धव ठाकरें

सोमवार, 4 मार्च 2024 (09:04 IST)
"मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीचे ४२ खासदार निवडून दिले नसते तर भाजपला दिल्लीचे तख्त राखता आले नसते. मात्र आता भाजपचे तख्त फोडावेच लागेल. अबकी बार भाजप तडीपार, हा आपला नारा असला पाहिजे," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला आहे.
 
धारावीतील भाषणात काय म्हणाले उद्धव ठाकरे?
 
नरेंद्र मोदींसह भाजपवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की, "ज्यावेळी देशाला लढवय्यांची गरज आहे, त्यावेळी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना झालीय. आता ही लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी अशी असणार आहे. जनतेने ठरवायचंय, तुम्हाला माजलेले लोकं हवीत की तुम्हाला समजून घेणारे समाजवादी लोकं हवी आहेत? मोदीजी फक्त गावांचं, योजनांचं नाव नाही बदलत तर त्यांनी आता जुमल्याचं नाव पण ‘गॅरंटी’ केलंय. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये जा! तुमचा केसही वाकडा होणार नाही, ही ‘मोदी गॅरंटी’ आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. तसंच  हुकूमशाहीला आता एकच पर्याय, लोकशाही वाचवणे. काँग्रेसकडे जर ८०० कोटी असतील, तर भाजपकडे ८००० कोटी आहेत. मग देश कुणी लुटला? असा सवालही उद्धव यांनी विचारला आहे.
 
दरम्यान, "भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नितीन गडकरींचं नाव भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाही, पण भाजपने घोटाळ्याचे आरोप केलेल्या कृपाशंकर सिंह ह्यांचं नाव आहे. ही कुठली गॅरंटी?" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती