डोंबिवली MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग

बुधवार, 12 जून 2024 (16:11 IST)
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. इंडो अमाईन्स असं या केमिकल कंपनीचं नाव असून, डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मध्ये ही कंपनी असल्याची माहिती मिळतेय.ही कंपनी रहिवासी संकुलात आहे. अभिनव शाळा नावाची शाळाही या दुर्घटनाग्रस्त कंपनीच्या बाजूला आहे.अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली MIDC च्या फेज 2 मध्ये ही आग लागली आहे. स्फोटांचे आवाज आल्यानं असल्याने परिसरात घबराट पसरली आहे.सध्या आजूबाजूच्या रहिवाशांना स्थलांतरित केलं जातंय. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या भागाचा वीजपुरवठा बंद करण्यात आलेला आहे.
 
स्थानिक आमदारांनी काय माहिती दिली?
डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, “अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. कंपनीचे कर्मचारी आणि कंपनीचे प्रमुख यांच्याशी मी बोललो आहे. कंपनीच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व कामगारांना सद्यस्थितीत बाहेर काढा आणि प्रिकॉशन्स घ्या हे आता आपण सांगितलेलं आहे.”
 
ते पुढे म्हणाले, “आग मोठी आहे. यासंदर्भात बऱ्याच कंपन्यांना आधीच नोटीस दिलेल्या होत्या. कारवाईचे आदेश दिलेले आहेत. सरकार म्हणून जी कारवाई करायची होती ती करायला सुरुवात झाली होती. पण त्या दरम्यान ही दुसरी आग लागली आहे, ही गंभीर बाब आहे.""माझ्या माहितीप्रमाणे सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे," असंही रविंद्र चव्हाण म्हणाले.कंपन्या स्थलांतरित करण्यासाठी काय करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येईल, असंही ते पुढे म्हणाले.
 
धोकादायक कंपन्या का स्थलांतरित झाल्या नाहीत?
डोंबिवलीतल्या घटनेनंतर हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
इथली वास्तवातली परिस्थिती पाहिली तर एकेकाळी शहराबाहेर दूर असलेली 'एमआयडीसी' आता जवळपास शहराचं मध्यवर्ती केंद्र बनलं आहे. त्यामुळे असे काही अपघात घडले की निवासी नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येते.हाच प्रश्न जेव्हा 2016 सालच्या घटनेनंतर समोर आला, तेव्हा काही कंपन्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्याचा प्रस्ताव समोर आला.
 
जवळपास 156 अशा धोकादायक रसायनांचा वापर करणाऱ्या कंपन्यांना पाताळगंगा इथल्या औद्योगिक वसाहतीत हलवण्याचा प्रस्ताव होता. जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही असा निर्णय घेण्याबाबर चर्चा सुरु होती. पण इथल्या स्थानिक उद्योजकांकडून या प्रस्तावाला आजही विरोध आहे.
 
महिन्याभरापूर्वीही घडलेली दुर्घटना
महिनाभरापूर्वीच डोंबिवली MIDC मध्ये आग लागली होती. त्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही घटना घडली आहे.
 
या अमुदान कंपनीतल्या आगी मोठी जीवितहानी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की, "लाल कॅटेगरी मध्ये मोडणारे अतिधोकादायक युनिट (highly hazardous units (red category)) तातडीने बंद केले जातील. त्यांनी चेंज ऑफ युज करून नॉन हझार्डसमधलं प्रॉडक्शन करावं. जेणेकरून जीवीतहानी होणार नाही. शहराबाहेरच्या एमआयडीसीमध्येब शिफ्टिंगची मुभा त्यांना दिली जाईल.”
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती