स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे झाल्याने प्रतापगडाचा संपूर्ण परिसर उजळून काढण्यात आला

शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (08:58 IST)
किल्ले प्रतापगड अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे झाल्याने गुरुवारी रात्री ३६३ मशालींनी प्रतापगडाचा संपूर्ण परिसर उजळून काढण्यात आला. गडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रोत्सवातील चतुर्थीला ३५९ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गत २०१० सालापासून ही परंपरा सुरू असून, यंदा या उत्सवाचे १३ वे वर्ष आहे.
 
किल्ले प्रतापगडवर ढोल-ताशांच्या गजर आणि फट्याक्यांची आतषबाजीत सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी चौथ्या माळेला हजेरी लावली. राजमाता कल्पनाराजे भोसले याही या महोत्सवाला उपस्थित होत्या. चतुर्थी दिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी स्वराज्य ढोल-ताशा पथकाच्या गजरात व भगवे झेंडे फडकावित मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांना डोळ्यांत साठवून ठेवला.

Edited by  : Ratandeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती