मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!

मंगळवार, 11 एप्रिल 2023 (20:53 IST)
राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला.
 
दि.४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.
 
महसुली विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे :
 
अमरावती विभाग – २४ कोटी ५७ लाख ९५ हजार,
 
नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार,
 
पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार,
 
छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार.
 
एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती