दरोडेखोर गेले आणि भुरटे चोर आले, सदाभाऊंची भाजपवर टीका

शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:28 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. राज्याला लुटणारे काँग्रेस-राष्ट्रवादीतील मोठे दरोडेखोर गेले आणि भुरटे चोर सत्तेवर आले आहे, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी भाजप सरकारवर टीका केली.

भाजप सरकार शेतकर्‍यांसाठी काय करते ते पाहू अन्यथा आपला रस्त्यावरचा मार्ग मोकळा, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी भाजपला दिला आहे.

श्रीरामपूर येथे ऊस व दूध परिषदेत सदाभाऊ बोलत होते. यावेळी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपने मला मंत्री केले किंवा नाही केले तरी शेतक-यांच्या प्रश्नालाच पहिले माझे प्राधान्य राहील. मंत्री झाल्यावर कारखानदारीच्या माध्यमातून शेतक-यांना लुटणा-या साखर सम्राटांच्या संपत्तीची चौकशी करायला लावू. भाजपने चोर बरोबर घेऊन राजकारण करू नये. या सरकारने प्रथम दुष्काळाने होरपळलेल्या राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी करावीत तसेच संपूर्ण वीज बिले माफ केली पाहिजेत अन्यथा मंत्री केल्यानंतरही त्यावर लाथ मारू असेही खोत यांनी सांगितले. 15 वर्षे संघटनेने आंदोलन केले. दहा हजार कार्यकर्ते तुरुंगात गेले. त्यामुळे सरकार बदलल्याचे खोत म्हणाले.  

वेबदुनिया वर वाचा