मुंबई महापालिकेत नगरसवेकांच्या संख्येत वाढ होणार, विधेयक मंजूर

मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (21:46 IST)
पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक  होणार आहे. या निवडणुकीत मुंबई महापालिकेत  नगरसवेकांच्या संख्येत वाढ होणार आहे. मुंबई मनपातील 9 प्रभाग वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. याबाबतचे विधेयक  विधिमंडळात मंजुरीसाठी आले.
 
या विधेयकाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. महापालिकेच्या वॉर्डची फेररचना करताना भाजपचे नगरसेवक असलेल्या ४२ नगरसेवकांच्या वॉर्डची पुनर्रचना केली. वेडेवाकडे वॉर्ड तयार केले. आम्ही ही चूक निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव परत पाठवला.
 
२०११ च्या जनगणनेप्रमाणे वॉर्डची पुनर्रचना झाली आहे. त्यामुळे आता पुनर्रचनेची गरज नाही. हा निर्णय शुद्ध हेतूने घेतलेला नाही. आम्ही याविरोधात गरज पडल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
 
त्याला उत्तर देताना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेशाला कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. वॉर्ड रचना करून निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेतो. तसेच यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्याचे स्पष्ट केले. यानंतर हे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती