चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करा – मुख्यमंत्री

बुधवार, 31 मार्च 2021 (22:34 IST)
मुंबई,  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डिजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची ७४ वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या  बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. 
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डिजीसीएने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. निश्चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीत विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कपूर यांनी राज्यातील विविध विमानतळांच्या कामांविषयी सविस्तर अहवाल सादर केला. शिर्डी विमानतळावरून कार्गो सुविधा सुरु केल्याने चांगला महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधेमुळे परिसरातील गुलाब, भाजीपाला, द्राक्ष, पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा माल देशभरात पाठविता येऊ लागला आहे. लवकरच येथे नाईट लॅण्डिंग सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती