स्वावलंबनाचे धडे : बोधकथा

मंगळवार, 27 ऑक्टोबर 2015 (11:34 IST)
सहदेव महाराज व त्यांचे दोन शिष्य पांडुरंग व प्रताप हे दोघेजण वासोट्याच्या जंगलात फिरत होते. नागेश्वरीकडे जाण्याची वाट त्या जंगलात न सापडल्याने फिरून फिरून ते सारेजण दमले होते. अंधारूनही आले होते. काय करावे याचा विचार सुरू असतानाच अचानक त्यांना डरकाळी ऐकू आली. वाघाच्या त्या नुसत्या डरकाळीनेच सारेजण गर्भगळित झाले. 
 
पांडुरंग महाराजांच्या पाठीशी लपण्याचा प्रयत्न करू लागला. तर प्रताप झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून सहदेव महाराजांनी प्रतापचा हात धरला. ते त्याला म्हणाले, ‘अरे, पळतोस कुठे? थांब, आपण तिघे मिळून परमेश्वराची प्रार्थना करूया. तो प्रसन्न होईल आणि मग या संकटापासून आपले रक्षण करील.’ 
 
हे ऐकून आपला हात सोडवून घेत प्रताप म्हणाला, ‘महाराज, आपणच आम्हाला स्वावलंबनाचे धडे दिलेत ना? मग जे काम आम्ही स्वत: करू शकतो त्याला परमेश्वराची, तो येण्याची आणि प्रसन्न होण्याची गरजच काय?’
 
तात्पर्य : प्रयत्नांच्या अभावी केवळ प्रार्थना केली तर परिणाम शून्य.

वेबदुनिया वर वाचा