'आम्हाला अनेक मृतदेह कोणाचे आहे हे ओळखता आलं नाही', कुवेतमधील प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

गुरूवार, 13 जून 2024 (17:50 IST)
-इम्रान कुरेशी
केरळच्या कोल्लममध्ये राहणाऱ्या उमरुद्दीन शमीर यांचं कुटुंबीय एवढ्या धक्क्यात आहेत की, ते बोलूही शकत नाहीयेत. त्यांचे शेजारीच त्यांच्या फोनवरून बोलत आहेत.
 
कुवेतच्या एका इमारतीत आग लागून मृत्यू झालेल्यांमध्ये 29 वर्षीय उमरुद्दीन यांचा समावेश आहे. ते एका भारतीय मालकाच्या तेल कंपनीत ड्रायव्हरचं काम करत होते.
 
त्यांच्या शेजाऱ्यांनी नाव न सांगता बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "ते लोक धक्क्यात आहेत. काही तासांपूर्वीच त्यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती मिळाली आहे. उमरुद्दीन यांचा नऊ महिन्यांपूर्वीच निकाह झाला होता. त्यावेळी ते इथं आले होतं. त्यांचे आई-वडील बोलण्याच्या स्थितीत नाहीत."
 
कुवेतमधील उमरुद्दीन यांचे मित्र नौफाल यांनीही बीबीसी हिंदीबरोबर बोलताना याबाबत माहिती दिली. "मला त्यांच्या कुटुंबाबाबत फार काही माहिती नाही. त्यांच्या इमारतींपासून तीन इमारती दूर मी राहतो. आम्ही सगळे एकाच तेल कंपनीत काम करतो. उमरुद्दीन एक मजूर होते. त्या इमारतीत नेमकं कोण होतं आणि कोण नव्हतं हे सांगणं कठिण आहे."
 
नौफाल म्हणाले की, "तेल कंपनीत काम करणारे लोक शिफ्टमध्ये काम करत होते. सात जणांचा एक ग्रुप पहाटेच कंपनीत कामासाठी गेला होता. जवळपास दीडच्या आसपास. ते सगळे परत आले असून प्रचंड धक्क्यात आहेत."
 
त्यांच्या मते, त्या इमारतीत बहुतांश भारतीय आणि त्यातही केरळ आणि तामिळनाडूचे लोक होते. पण इतर देशांचेही काही लोक त्याठिकाणी राहत होते.
 
केरळच्या मुस्लीम कल्चरल सेंटर (केएमसीसी)च्या कुवेत युनिटचे शरफुद्दीन कोनेत्तू यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं की, "आता आम्हीही पीडितांचा शोध घेत आहोत. कदाचित त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा ते जखमी असतील."
 
शरफुद्दीन स्वतः घटनास्थळीच होते. ते म्हणाले की, "आम्हाला अनेक मृतदेह कोणाचे आहे हे ओळखता आलं नाही. कारण खालच्या मजल्यावर लागलेली आग सहा मजली इमारतीत पूर्णपणे पसरली होती. आतापर्यंत किमान 11 भारतीयांची ओळख पटली आहे. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी आहेत. काही मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागू शकते."
 
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?
तामिळनाडूचे मणिकंदन कुवेतमध्ये मजुरी करतात. त्यांनी बीबीसी तमिळशी बोलताना या घटनेबाबत माहिती दिली.
 
मणिकंदन म्हणाले की, "आगीची घटना घडली त्यापासून जवळच असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये मी राहतो. सध्या उन्हाळा असल्यानं बहुतांश मजूर नाईट शिफ्टमध्ये काम करतात. त्यापैकी नाईट शिफ्टनंतर पहाटे घरी आलेले काही मजूर स्वयंपाक करत होते. आग लागताच ती अत्यंत वेगानं पसरली. इमारतीत असलेल्या लोकांना या आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य नव्हतं."
 
"इमारतीत राहणारे बहुतांश भारतीय होते. विशेषतः केरळ आणि तामिळनाडूचे होते. त्या इमारतीत राहणाऱ्या कोणालाही मी व्यक्तीशः ओळखत नाही. पण आग लागल्यानंतर अनेकांचा धुरामुळं जीव गुदमरत असल्याचं मी पाहलं. पहाटेची वेळ असल्यानं त्यांच्यापैकी काहीजण झोपेलेले होते. "
 
या घटनेतून बचावलेल्या एका व्यक्तीनं म्हटलं की, "मी पाचव्या मजल्यावर झोपलो होतो. अचानक शेजाऱ्यांनी दार ठोठावलं. मी बाहेर आलो तर काळ्या धुराशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. मी काहीही पाहू शकत नव्हतो."
 
"ज्या लोकांनी आमचं दार वाजवलं होतं, ते जीव वाचवण्यासाठी दुसरीकडे गेले. त्यामुळं आम्ही इतर खोल्यांचे दरवाजे वाजवू शकलो नाही. आमच्या खोलीची खिडकी मोठी होती. त्यामुळं आम्ही चौघेही त्याच मार्गाने बाहेर पडलो. पण माझ्या शेजारच्या खोलीची खिडकी लहान होती. त्यांना तिथून बाहेर पडता आलं नाही," असं ते म्हणाले.
 
कुवेतमध्ये बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्यां 49 जणांपैकी बहुतांश भारतीय होते.
 
कुवैतमधील भारतीय राजदुतांनी रुग्णालयांना भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे. या घटनेत सुमारे 50 जण जखमीही झाले आहेत.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुवेतच्या मंगाफ परिसरातील एका सहा जमली इमारतीच्या किचनपासून आगीची सुरुवात झाली.
 
त्यावेळी इमारतीत 160 मजूर होते. हे सर्व मजूर एकाच कंपनीत काम करणारे आहेत.
 
घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, "कुवेतमधील आगीची घटना दुःखद आहे. आप्तेष्टांना गमावणाऱ्या कुटुंबीयांबरोबर आमच्या संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो."
 
पंतप्रदानांच्या निर्देशावर राज्य मंत्री कीर्तिवर्धन सिंह कुवेतसाठी रवाना झाले आहेत.
 
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी, कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांच्याशी चर्चा केल्याचं एक्सवर लिहिलं. त्यांनी दुर्घटनेची संपूर्ण चौकशी आणि दोषींना शिक्षा करण्याचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
कुवेतमधील नेपाळचे राजदूत घनश्याम लमसल यांनी या इमारतीत पाच नेपाळी राहत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
 
लमसल यांच्या मते, "पाचपैकी दोघं सुरक्षित असून तीन जखमी आहेत. दुतावासातील कर्मचारी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेत आहेत."
 
कुवेतचे उपपंतप्रधान शेख फहद युसूफ अल सबाह यांनी घटनास्थळाचा दौरा केला आहे.
 
"मालकांचा लालचीपणा घटनेसाठी कारणीभूत आहे," असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
 
कुवेतच्या माध्यमांच्या रिपोर्टनुसार या इमारतीत क्षमतेपेक्षा अधिक लोक राहत होते.
 
गृहमंत्र्यांनी या प्रकरणांत नियमांच्या उल्लंघनाची चौकशी केली जाईल, असं सांगितलं आहे.
 
भारतीय दूतावासानं या घटनेनंतर +965-65505246 हा हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध केला आहे. लोक मदतीसाठी यावर कॉल करू शकतात.
 
कुवेतमध्ये दोन-तृतीयांश लोकसंख्या स्थलांतरित मजुरांचीच आहे. हा देश बाहेरुन आलेल्या मजुरांवर अवलंबून आहे. मानवाधिकार संघटनांनी कुवैतमधील स्थलांतरित लोकांच्या राहनीमानाबद्दल अनेकदा काळजी व्यक्त केलेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती