दम असेल तर महापालिकेच्या निवडणुका घ्या

बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (07:59 IST)
अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल. हे अनाडी घोडे उधळलेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतरचे फटाके घटनाबाह्य सरकार वाजवत असून ते फुसके फटाके आहेत. अशी जोरदार टिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर महायुतीला यश मिळाले. त्यावर येत्या काळात महायुतीचेच सरकार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तसेच राज्यभरात महायुतीकडून जल्लोष झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.
 
आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “प्रत्येक जण ग्रामपंचायत निकालाचे आकडे आपापल्या बाजूने दाखवत आहेत….आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले, हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे एक मूर्खपणा आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. आणि ही गोष्ट जर घटनाबाह्य सरकारला माहीत नसेल तर सरकारमधील लोक अनाडी असून हे अनाड्यांचं सरकार आहे. आता हे अनाडी घोडे उधळलेले आहेत.” असे म्हणून संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात. त्यांची हातभर फाटते. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगणे हे हास्यास्पद आहे. तसेच जे 14 महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिकासह इतर 14 महापालिकांच्या निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं कोण हरलं? ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे. त्यांचे आता फक्त आकड्यांचेच खेळ चालू आहेत.” असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती