T-20 वर्ल्ड कप: रोहित शर्माने दिलेली सूट, ज्यामुळे भारत फायनलमध्ये पोहोचला

शुक्रवार, 28 जून 2024 (12:47 IST)
टी-20 क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला एक प्रश्न विचारण्यात आला.
 
"ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची ठरली?" हा तो प्रश्न होता.
 
यावर रोहित हसत हसत म्हणाला की, आता ऑस्ट्रेलिया विश्वचषकात नाहीये.
 
स्पष्ट आहे की, रोहितला 19 नोव्हेंबर 2023 रोजी एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव आणि जून 2023 मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभव स्पष्टपणे सांगायचा नव्हता.
 
अशात ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात रोहितला मोठा आनंद मिळाला.
 
सुमारे दोन वर्षांपूर्वी ॲडलेडमध्ये झालेल्या उपांत्य फेरीत भारताचा अत्यंत वाईट पराभव झाला होता.
 
यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीच्या शैलीवर बरीच टीका झाली.
 
उपांत्य फेरीतील मैदानाची स्थिती
दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी गयानाची खेळपट्टी ॲडलेडसारखी सपाट नव्हती.
 
इथे धावा काढण्यासाठी अनुभवाबरोबरच क्षमता आणि धैर्यही आवश्यक होतं.
 
रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक दिसला, तर जोस बटलरच्या संघाविरुद्ध त्याने कठीण खेळपट्टीवर संयम आणि आक्रमकता यांचा उत्कृष्ट मिलाफ दाखवला.
 
रोहितने सामन्यातील एकमेव अर्धशतक झळकावले आणि या विश्वचषकातील तिसरे शतक झळकावले.
 
रोहितवरील जबाबदारी आणि दबाव वाढला होता कारण माजी कर्णधार विराट कोहली या फॉरमॅटमध्ये अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे.
 
सात डावात 11 पेक्षा कमी सरासरी आणि 100 चा स्ट्राईक रेट कोहलीसारख्या फलंदाजाला शोभत नाही. कोहलीनेच विश्वचषकापूर्वी आयपीएलमध्ये 741 धावा काढल्या होत्या.
 
कोहलीचा संघर्षाचा काळ असला तरीही भारतीय संघाला याचा अजिबात फटका बसलेला नाही. कारण सूर्यकुमार यादवने रोहितसोबत सातत्य आणि महत्त्वाच्या क्षणी उत्कृष्ट खेळी करत सामना बरोबरीत ठेवला.
 
रोहितसोबत सूर्याची भागीदारी
मुंबईच्या सूर्याने आपल्या कर्णधारासोबत जबरदस्त भागीदारी करत 171 धावांचे लक्ष्य ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
सूर्याने 36 चेंडूत 47 धावा काढल्या.
 
याशिवाय हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 23 धावा, रवींद्र जडेजाच्या 9 चेंडूत 17 धावा आणि अक्षर पटेलच्या 6 चेंडूत केलेल्या 10 धावांनी कर्णधार रोहित एकदम योग्य ट्रॅक वर आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं.
 
रोहित फलंदाजीच्या क्रमात चोख असतो कारण 1 ते 8 क्रमांकापर्यंतचा प्रत्येक फलंदाज मोकळेपणाने खेळला पाहिजे हे त्याचं उद्दिष्ट असतं.
 
पण, भारतीय संघाने सामना जिंकला तर तो त्यांच्या गोलंदाजीमुळेच.
 
अक्षर पटेल हा कुलदीप यादवसारखा मॅचविनर नाही जो कसाही चेंडू टाकून कोणत्याही सामन्याचा मार्ग बदलू शकतो, ना त्याला जडेजासारखा अनुभव आहे.
 
अक्षरचं प्रदर्शन
मोठमोठ्या खेळाडूंच्या सावलीत राहूनही माणसाची स्वत:ची वेगळी ओळख असते, हे अक्षरने या विश्वचषकात दाखवून दिलंय.
 
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत पाकिस्तानींना थक्क केलंय.
 
त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आश्चर्यकारक झेल घेत सामन्याचा रंग बदलला.
 
याशिवाय तो प्रत्येक सामन्यात आपल्या गोलंदाजीने चांगला प्रभाव पाडत आहे. पण त्याने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला ज्या पद्धतीने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, त्यावरून असं म्हणता येईल की, गुजरातचा हा खेळाडू हळूहळू सर्वांना आपला रंग दाखवून देतोय.
 
दुर्दैवाने दुखापतीमुळे पटेल एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडला आणि शेवटच्या क्षणी आर अश्विनला संधी मिळाली.
 
पटेल स्वतः 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला विश्वचषक खेळला होता.
 
पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दशक घालवल्यानंतरही, त्याला आपलं स्थान पक्क करता आलं नाही, ना त्याची चाहत्यांमध्ये चर्चाही झाली.
 
आता बरंच काही बदलू शकतं कारण त्याच्या तीन विकेट्सच्या स्पेलने इंग्लंडचं कंबरडं मोडलं.
 
पटेलने 4 षटकात 23 धावा देऊन 3 बळी घेतले, तर कुलदीपने टाकलेल्या तेवढ्याच षटकात केवळ 19 धावा देऊन तेवढेच बळी घेतले.
 
कर्णधार रोहित शर्माच्या काळात कुलदीपचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
 
हा विजय काय सांगतो?
एकंदरीत, भारतीय संघाच्या खेळाडूंसाठी हा पुन्हा एकदा सामूहिक विजय होता, जिथे अक्षर ते कुलदीप आणि रोहितपर्यंत सर्वजण सामनावीरसाठी दावेदार ठरले.
 
तीन वेगवान गोलंदाज असूनही, संपूर्ण सामन्यात रोहितने त्यांना 6 षटकंही टाकू दिली नाहीत. कारण खेळपट्टीवर फिरकीपटूंची बरीच मदत झाली.
 
असं असतानाही इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
 
रोहितने सांगितलं होतं तो फलंदाजीलाच प्रथम प्राधान्य देईल.
 
2014 टी 20 विश्वचषक उपांत्य फेरीत पहिल्यांदा फलंदाजी करून संघाने (श्रीलंका) नॉक-आउट सामना जिंकला होता.
 
तेव्हापासून, प्रत्येक बाद सामन्यात (गेल्या 5 विश्वचषकातील) 12 वेळा, उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामना आणि स्पर्धा जिंकल्या आहेत.
 
29 जून रोजी रोहित पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फलंदाजी करताना दिसणार आहे, ज्यामुळे संपूर्ण स्पर्धेत त्याचा संघ एकही सामना हरणार नाही.
 
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी काही महिन्यांपूर्वी असं म्हटलं होतं की, गेल्या 12 वर्षांपासून विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, असं प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींना वाटतं.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती