अवकाळी पाऊस म्हणजे काय? हा पाऊस कशामुळे येतो, जाणून घ्या.. पूर्ण माहिती

मुंबई आणि राज्यभरातील बहुतांशी जिल्ह्यांमधील कमाल तापमानाचा पारा वर-खाली होत असतानाच आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा तीन दिवसांसाठी हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
 
भारतीय हवामानशास्त्र विभागातील अतिरिक्त उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान कमी अधिक फरकाने नोंदविण्यात येत आहे. पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, गडचिरोली, वाशिम, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. येत्या २, ३ दिवसांत विदर्भात मेघ गर्जना, विजा, जोरदार वारे वाहतील. हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
 
हे वरील वृत्त अगदी ताजे आहे. हे वाचून अनकेदा प्रश्न निर्माण होतो कि, अवकाळी पाऊस म्हणजे काय, तो कसा पडतो,
 
हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अवकाळी पाऊस ‘हमखास’ येतो. त्याचे प्रमाण नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या तुलनेत अत्यल्प असते आणि त्यामुळे होणारे नुकसान जास्त. त्यामुळे या पावसाला नाके मुरडली जातात. पण तरीही निसर्गाचे हे चक्र आणि या पावसाची जन्मकथा मात्र मोठी रोचक आहे.
 
अवकाळी पावसाचेही तसेच. अवकाळी म्हणजे काळ वेळ न बघता आलेला. आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पडतोय त्या गारांच्या पावसाला अवकाळी पाऊस म्हटले जाते. आता ही काळ-वेळ माणसांच्या दृष्टीने. जून ते सप्टेंबरमधला पाऊस शेतीसाठी चांगला आणि इतर वेळचा पाऊस शेतीसाठी मारक म्हणून अवेळी आलेला. त्यातच हा पाऊस म्हणते नुसते पाणी नव्हे तर गारांचा मारा. त्यामुळे हा पाऊस पडला की जून महिन्यात छापली जातात तशी पावसात नाचणाऱ्या मुलांऐवजी जमिनीवर पडलेल्या शेतीची आणि मोठमोठय़ा गारांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. पण हा पाऊस काही अवेळीचा नाही. दरवर्षी या सुमारास तो येतो.
 
अवकाळी पाऊस हा शब्दप्रयोग सध्या प्रचलित झाला आहे. हा शब्दप्रयोग वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. जेव्हा मान्सूनच्या पावसाची आकडेवारी आपण काढतो, काही संशोधन करतो, तेव्हा आपण आपल्या सोयीसाठी १ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी निवडला आहे. त्यामुळे संपूर्ण पाऊस या कालावधीतच पडतो, अशी एक समजूत झालेली आहे. मान्सूनचा ८० टक्के पाऊस जून ते सप्टेंबरमध्ये पडतो आणि उर्वरित पाऊस उन्हाळा आणि हिवाळ्यात पडतो.
उन्हाळा आणि हिवाळ्यातील पाऊस
भारतीय द्वीपकल्पाच्या दोन बाजूंना अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे. महाराष्ट्रात या दोन्ही दिशांकडून येणारे वारे वाहत असतात. या वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा वेगवेगळी असते. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये बाष्प असतं. हे वारे उष्ण असतात. हे वारे महाराष्ट्रात वाहात असतानाच उत्तरेकडून थंड आणि कोरडी हवा वाहू लागते. हे दोन्ही परस्परविरोधी वारे एकमेकांशी भिडतात. हे दोन्ही वारे एकमेकांशी भिडण्यासाठी महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मार्चमध्ये पाऊस पडताना दिसतो
 
गर्जन्मेघ हा निम्न पातळीवर तयार होणारा ढग असला तरी त्याचा वरचा भाग उच्च पातळीपर्यंत वर गेलेला आढळतो. अनेक मेघपुंज एकावर एक रचून पर्वतासारखा उंच वाढणारा, वरील भाग ऐरणीप्रमाणे दिसणारा, तर तळभागात अनेक वर्षास्तरी मेघखंड असणारा हा ढग अस्थिर हवेचा निदर्शक मानला जातो. ढगाच्या तळभागात जलबिंदू तर वरील भागात हिमकण असे त्याचे घटक असतात. हे ढग घनदाट असल्यामुळे खालून पाहताना काळे दिसतात. हे ढग एकएकटे किंवा एका पाठोपाठ एक असू शकतात.
 
अवकाळीने पिके केली जमीनदोस्त, शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट
ह्या ढगांपासून विजा पडून गडगडाटासह जोरदार वृष्टी मिळू शकते. बऱ्याचदा ह्या ढगांबरोबर जोरदार वादळवारेही वहात असतात. असे वारे व जोरदार वृष्टी ही काही वेळा विध्वंसक ठरू शकते. मात्र हे ढग फार काळ टिकत नाहीत. होणारी वृष्टी आणि जोरदार वाहणारे वादळ वारे ह्यामुळे आसपासची हवा थंड होते व आर्द्र हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह दुबळे होतात आणि थोड्या वेळातच ढग नाहीसे होतात. मान्सूनपूर्व म्हणजे पावसाळ्याच्या आधी पडणारा वळीवाचा पाऊस किंवा गारा ह्याच प्रकारच्या ढगातून पडतात. पावसाळ्याच्या शेवटीशेवटी होणारा हस्त नक्षत्रातील पाऊस असल्याच ढगांतून पडतो.
 
क्युमिलो निंबस ढग कसा तयार होतो?
Cumulonimbus clouds: थंड आणि उष्ण वारे एकमेकांना भिडल्यानं हे ढग निर्माण होतात. वारे एकमेकांना भिडल्यानं हवा वर जाते आणि उंच ढग निर्माण होतात. उदाहरणार्थ, डोंगरदेखील हवेच्या प्रवाहांना अडवतात. तेथील हवा वर जाते आणि उंच ढग निर्माण होतात. महाराष्ट्रात फेब्रुवारी-मार्चमध्ये अशा प्रकारचा पाऊस सातत्यानं पडताना दिसून आलेला आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणात गारपीटदेखील झाली आहे. त्यामुळे हा पाऊस अनपेक्षित नसून या घटना घडत असतात. पूर्वी त्याचं पूर्वानुमान काढणं शक्य नव्हतं. आता पूर्वानुमान काढणं शक्य असल्यानं पिकांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार आणि त्यावर काम व्हायला पाहिजे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स
नावाप्रमाणेच वातावरणातील हा प्रक्षोभ पश्चिमेकडून होतो. पश्चिमेकडून वाहणारे वारे थंड आणि शुष्क असतात. महाराष्ट्रात दमट आणि उष्ण हवा असते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ वाहत असतात आणि दक्षिणेकडे ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ असते. हे ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ आणि ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ एकमेकांत मिसळल्यानं अवकाळी पाऊस पडतो. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ साधारण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरवातीस येतात.
 
‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ म्हणजे काय?
वारे त्यांची वाहायची दिशा कशी ठरवतात, हे पाहणंही रोचक आहे. वारे कसेही आणि कोणत्याही दिशेला वाहत नाही. हवा वक्राकार फिरत वर जाते. ही हवा वर जाताना वाटेतील सगळं बाष्प एकत्र करत करत पुढे जाते. याउलट ‘अँटी क्लॉकवाइज सर्क्युलेशन’ असते. इथं बाष्प केंद्रित होण्याऐवजी पसरतं. एखादी गोष्ट पसरल्यानं त्याचा प्रभाव कमी होतो, तर ती एकत्रित आल्यानं त्याचा प्रभाव वाढतो. ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ एक प्रकारे हवामान नियंत्रित करण्याचं काम करतं. यामुळे हवा एकाच जागी न राहता, ती फिरत राहते. त्यामुळे वारे, बाष्प, पाऊस इकडून तिकडे जाते आणि त्यामुळे बिगरमोसमी पाऊस पडतो.

Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती