आमच्या वाट्याला जायचे नाही, मुख्यमंत्रिपदावरून जावं लागले

शुक्रवार, 10 मार्च 2023 (07:41 IST)
आपल्या वाट्याला कुणी जाऊ नये. मशिदीवरील भोंग्यांविरोधात जेव्हा आंदोलन झाले. तेव्हा राज्यभरात १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकण्यात आल्या. बोललो होतो वाट्याला जायचे नाही, मुख्यमंत्रिपदावरून जावे लागले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. आजपर्यंत अनेक त्रासातून जावे लागले आहे. भाजप तुम्हाला सत्तेवर दिसत आहे. पण कित्येक लोकांनी त्यासाठी कष्ट घेतले, खस्ता खाल्ल्या, १९५२ मध्ये जनसंघ नावाने त्या पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर १९९६ ला १३ दिवसांसाठी, १९९८ ला १३ महिन्यांसाठी, १९९९ ला साडेचार वर्षांसाठी आणि त्यानंतर २०१४ मध्ये मोठे यश मिळवले. मात्र, त्यासाठी खूप गोष्टींमधून जावे लागते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
 
दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात राज ठाकरे यांनी जाहीरपणे पहिली प्रतिक्रिया दिली. संदीप देशपांडे यांच्यावर ज्याने हल्ला केला, त्यांना आधी कळेल, आणि मग सगळ्यांना कळेल. माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही, असे राज ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितले.
मनसेच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी ठाण्यात मनसैनिकांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत रोखठोक भाष्य केले. तुमचे हिंदुत्व म्हणजे नेमके काय, असा सवाल करत, प्रत्यक्ष कृती करताना कुणीच दिसत नाही. भोंग्याच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलावण्यात आले. मात्र, विरोध करणारे कोण, हे हिंदुत्ववादी होते. मला आतमध्ये काय चालले आहे, ते कळले होते. राजकारण समजले होते. त्यामुळे तेव्हा अयोध्या दौरा पुढे ढकलला. ज्यांनी विरोध केला, त्यांचे पुढे काय झाले, अशी खोचक विचारणा राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांचे नाव न घेता केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती