छत्रपती संभाजीनगर-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील गौताळा अभयारण्यात पर्यटकांना 15 ऑगस्टपर्यंत बंदी

सोमवार, 31 जुलै 2023 (21:00 IST)
Maharashtra tourism
मागील काही दिवसांत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. लेण्या, धबधबे, धर्मिक स्थळे, एतेहासिक स्थळ, किल्ले यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील गौताळा अभयारण्यात देखील अशीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते.
 
सर्वत्र हिरवा शालू पांघरलेला आणि निसर्ग सौंदर्याची खाण असलेला गौताळा अभयारण्य पर्यटकांना खुणवत असते. मात्र, याच गौताळा अभयारण्यात आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
 
वनविभागानं 15 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश बंदी घातली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असून, गौताळा अभयारण्य पाहण्यासाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
 
अभयारण्यात जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो. अशावेळी पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, यामुळे 15 ऑगस्टपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.
 
कन्नड तालुक्यामधील तब्बल गावातील वनक्षेत्राचा समावेश असलेल्या गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली. कन्नड तालुक्यात असलेलं हे अभयारण्य छत्रपती संभाजीनगरपासून 75, जळगावच्या चाळीसगाव पासून 20 आणि कन्नड शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. तर गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला पाहिल्यास पर्यटकांना सातमाळ्याचा डोंगर दिसतो. विशेष म्हणजे याच डोंगरातून नागद नदी उगम पावते आणि याच नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. तर भर उन्हाळ्यात सुद्धा नागद तलावात पाणी कायम राहते. त्यामुळे वन्यजीव उन्हाळ्यात या ठिकाणी तहान भागविण्यासाठी येतात. तर घनदाट जंगल आणि निसर्गाने मुक्त हाताने केलेली सौंदर्याची उधळण या ठिकाणी पाहायला मिळत असल्याने पर्यटकांची गर्दी असते. मात्र, आता यासाठी 15 ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती