अखरेचा प्रवास, तीन जीवलग मित्रांचा मृत्यू

गुरूवार, 3 मार्च 2022 (09:47 IST)
एका भीषण अपघातात तीन जीवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. आहेर वडगाववरून तीन मित्र बुलेटवर बसून बीडकडे येत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला आहे. तिन्ही मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या बसनं बुलेट वरुन जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली. यात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर एका मित्रानं बीडच्या जिल्हा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 
 
औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. पारसनाथ रोहिटे (वय २२) कृष्णा भारत शेळके (वय २३) आणि अक्षय सुरेश मुळे (वय २२) हे तीन जण बुलेटवरून बीडकडे जात असताना समोरून येत असलेल्या एसटी बसने दुचाकीस धडक दिली. यात पारसनाथ रोहिटे व कृष्णा शेळके हे जागीच ठार झाले, तर अक्षय मुळे यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना अक्षयचा मृत्यू झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती