माध्यमात माझ्या राजीनाम्याबद्दल चालवल्या जात असणार्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही : अनिल देशमुख

शनिवार, 20 मार्च 2021 (14:43 IST)
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सध्या महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. गृह विभाग सांभाळणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कामगिरी तर अतिशय सामान्य राहिल्याचे दिसून येत आहे.
 
मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकांसह आढळलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे एपीआय सचिन वाझे यांना अटक झाली. या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडीनंतर आता थेट गृहमंत्र्यांच्या गच्छंती होणार असल्याची चर्चा आहे.
 
नवी दिल्लीमध्ये काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात जवळपास २ तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली.तसेच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याचे समजते.
 
दरम्यान, अनिल देशमुख यांनी दिल्लीत पवारांची भेट घेतल्यावरून इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी देशमुख राजीनामा देणार असल्याचे वृत्त प्रसारित केले होते.यावर देशमुख म्हणाले की, माध्यमात माझ्या राजीनाम्याच्या बातम्या चालवल्या जात त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे जाहीर केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती