प्रसिद्धी पत्रक काढून राज्यपाल यांनी मागितली जाहीर माफी

सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (21:49 IST)
राज्यपाल भगत सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत  प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर माफी मागितली आहे. २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली, असं म्हणत राज्यपालांनी माफी मागितली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतिपथावर अग्रेसर होत आहे, असंही राज्यपालांनी पत्रकात म्हटले आहे.
 
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
 
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो, असंही महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणालेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती