हे सर्व प्रश्न सोडवूनच ईडी सरकारने जावे : नाना पटोले

मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (21:18 IST)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, देवेंद्र  फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील २०१४-१९ मधील भाजपा सरकारने एका जडीबुटी बाबाला मिहान मधिल जमीन दिली. पण आजपर्यंत या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभा राहिलेला नाही. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल असे स्वप्न दाखवले गेले. पण हा प्रकल्पच अद्याप सुरु झालेला नाही. मिहान हे विदर्भासाठी महत्वाचे आहे. पण येथील सगळे उद्योग बाहेर जात आहेत, इथले काही प्रकल्प गुजरातला पाठवले. जेव्हा जेव्हा भाजपाचे सरकार असते तेव्हा तेव्हा विदर्भाचे नुकसानच झाले आहे.
 
सुरजागड येथे मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत, ४०० वर्षे पुरेल एवढे लोह खनिजाचे साठे आहेत. या प्रकल्प झाल्यास महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लागू शकतो, भिलाईपेक्षाही मोठा प्रकल्प या ठिकाणी होऊ शकतो. हा प्रकल्प झाला पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. 
 
धान उत्पादक खरेदी केंद्रांचे वाटप घोटाळेबाजांना केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशी घोटाळेबाज खरेदी केंद्रे बंद झाल्याने नाईलाजाने शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडे जावे लागले व व्यापाऱ्यांनी त्यांची लूट केली. मेडीगट्टा धरणाने तेथील परिसराला मोठा फटका बसला आहे. या प्रकल्पाला पर्यावरण आणि वन विभागाची परवानगी नाही. 
 
हे सर्व प्रश्न या अधिवेशनात सोडवले नाहीत तर या सरकारला नागपूरमधून जावू देणार नाही. या अधिवेशनावर जनतेचे १५० कोटी रुपये खर्च होतात, नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन होत असते, त्यामुळे विदर्भातील प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, नागपूरमधून जावू देणार नाही, असा इशारा  नाना पटोले यांनी दिला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती