कुठलीही बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही : अनिल परब

शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (22:03 IST)
राज्यात एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 18 दिवसांपासून संप सुरु आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक झाली. इंटक आणि कामगार सेना संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 
 
बरेचसे कामगार कामावर रुजू झाले आहेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या युनियची कृती समितीशी चर्चा करुन याबाबतीत कामगारांचं म्हणणं, किंवा कामगारांची मानसिकता जी गेल्या काही दिवसात बघितली होती, त्यावर आणि एसटीची सेवा सुरुळीत करण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत, याबाबत चर्चा करण्यासाठी  बैठक झाली.
 
एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही मूळ वेतनात दिली असल्याने त्यांच्या ग्रेड्समध्ये काही तफावत निर्माण होऊ शकतात अशा प्रकारच्या काही बाबींचा उल्लेख त्यांनी केला. त्यांना सांगितलं संप जेव्हा संपेल तेव्हा यावर चर्चा करु, कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगारांच्या वर जाणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. एवढी वाढ दिल्यानंतरही संपाच्या बाबतीत जो काही संभ्रम आहे. त्याबद्दलही चर्चा झाली. 
 
काही जाचक अटी असेल त्यावर विचार केला जाईल, पण त्याचबरोबर कुठलीही बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही, याची देखेली जाणीव आम्ही त्यांना करुन दिली असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 
 
पगारवाढ देताना राज्य सरकारने जी हमी घेतली आहे, सर्वांच्या मदतीने एसटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत. काही मागणी आल्या आहेत की आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा आणि आमचा करार दहा वर्षांचा करा, आम्ही त्यावरही विचार करु शकतो, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती