शिवजयंतीच्या निमित्ताने गड-किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन येत असताना हा अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात आणि शिवभक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंदाच्या उत्सवाचे रूपांतर दुःखात झाले आहे.
नेमके काय घडले?
शिवजयंती निमित्त हे तरुण विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन मोठ्या उत्साहात आपल्या गावाकडे (शिंदेवाडी) पायी धावत परतत होते. ते नायगाव परिसरात आले असताना, समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने नियंत्रण गमावले. ही कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला आली आणि तिने या शिवभक्तांना जोराची धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, ओंकार आणि दर्शन या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण आंदर मावळ परिसरात शोककळा पसरली असून, शिवजयंतीच्या आनंदाचे रूपांतर दु:खात झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.