नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले, स्पष्ट शब्दात दिला इशारा

गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (15:02 IST)
सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात  सुनावणी सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांना उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. तुमच्याकडून बदनामीकारक विधान होत आहेत. ही बदनामी कुठेतरी थांबायला हवी. अन्यथा तुम्हाला बोलण्यास दिलेली सूटच काढून घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा उच्च न्यायालयाने मंत्री मलिक यांना दिला आहे.
 
वानखेडे यांच्याबाबत बदनामीकारक विधान करणं कुठेतरी थांबवायला हवं. अन्यथा तुम्हाला वानखेडे यांच्या बाबत बोलायची दिलेली सूटच काढून घ्यावी लागेल, अेस मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना सुनावले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेला उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. 
 
न्यायमूर्ती एसजे काथावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने निर्देश दिले की, “प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, मलिक हे ज्ञानदेव वानखेडे यांची  बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या बदनामीतून मलिक यांना काय साध्य करायचे आहे.  हे सतत चालू राहणे योग्य नाही, असे स्पष्ट शब्दात न्यायालयालाने मलिकांना बजावले आहे. मलिक हे वानखेडेच्या प्रकरणात  5 फेब्रुवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती