नाशिक : यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळाबाबत एक पाऊल पुढे

रविवार, 7 एप्रिल 2024 (10:26 IST)
नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे येथील बाजारपेठेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. तसेच वर्षभर या भागात रस्त्यांवर उभे केल्या जात असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. यावर तोडगा म्हणून महापालिकेच्या मालकीची असलेल्या यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले आहेत. मात्र, या जीर्ण झालेल्या इमारतीमधील भाडेकरू जागा सोडण्यास तयार नाहीत. यामुळे वाहनतळ उभारण्यास अडचणी येत आहेत.
 
याच पार्श्वभूमीवर म्हणून महापालिकेने जीर्ण झालेल्या यशवंत मंडई या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेतले होते. त्यात ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आला. यामुळे पालिकेने ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
 
मात्र, भाडेकरूंनी महापालिकेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने गाळेधारकांच्या विरोधात निकाल दिला असल्याने महापालिका प्रशासनाने या इमारतीचे निर्लेखन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
दरम्यान तत्पूर्वी इमारतीतील भाडेकरूंकडे असलेली एक कोटीची थकबाकी वसुलीसाठी पावले उचलली आहेत. यशवंत मंडईतील गाळेधारकांना नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात करसंकलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गाळेधारकांना आठवड्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर त्यांनी मंगळवारपर्यंत मुदत मागवून घेतली आहे.
 
थकबाकी भरण्यास तयार नसलेल्या भाडेकरूनच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचीही महापालिकेने तयारी सुरू केली आहे. या इमारतीत २३ गाळेधारक असून, त्यांच्याकडे दहा वर्षांपासून एक कोटी भाडे थकले आहे. भाडे न भरणाऱ्यांचे गाळे सील करण्यात येणार आहेत. व्यावसायिकांना गाळे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तत्पूर्वी थकबाकी वसुल केली जाणार आहे.
 
गाळे धारकांनी थकित भाडे न भरल्यास गाळे सील करून त्यांच्या मालमत्तेवर थेट बोजा चढवला जाणार आहे. दरम्यान भाडेकरूंनी महापालिकेकडे थकबाकी भरण्यासाठी पालिकेकडून मुदतवाढ देण्याची मागणी केली असता मनपाने मंगळवारपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.
 
त्यामुळे आता भाडेकरू महापालिकेला सहकार्य करण्यास तयार झाल्यामुळे या यशवंत मंडई इमारत पाडण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यानंतर तेथे बहुमजली वाहनतळ उभारणे प्रस्तावित आहे.  
 
रविवार कारंजा येथील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारण्याचे नियोजन आहे. येथे पार्किंगची जागा नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच ही इमारत पाडून तेथे बहुमजली वाहनतळ उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे रविवार कारंजा, मेनरोड, महात्मा गांधी मार्ग या परिसरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहने उभे करण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती