नगरपंचायत निकाल : कर्जतमध्ये राष्ट्रवादी तर तिवसामध्ये काँग्रेसची सरशी

बुधवार, 19 जानेवारी 2022 (11:08 IST)
राज्यात ओबीसी आरक्षाविना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या 45 जागांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागत आहेत.
 
अहमदनगरमधल्या कर्जतमध्ये आमदार हित पवारांचे एकहाती वर्चस्व दिसून आलं आहे. तिथं त्यांनी भाजपच्या राम शिंदेंना धक्का दिला आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपनं फक्त 2 जागा जिंकल्या आहेत.
 
तिवसा नगरपंचायतीमध्ये सत्ता राखण्यात मंत्री यशोमती ठाकूर यांना यश आलं आहे. 17 जागांपैकी काँग्रेस 12 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेनं 4 जागा जिंकल्यात. वंचितला इथं एक जागा मिळाली आहे.
 
राज्यातील 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी आणि 195 ग्रामपंचायतींमधील 209 जागांवर झालेल्या निवडणुकीचेही निकाल आज लागतील.
 
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं 15 डिसेंबर 2021ला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठीचा आदेश दिला.
 
या आदेशानुसार नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मागासवर्ग प्रवर्गाच्या अनारक्षित जागांसाठी काल  मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान झालं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती