मनोज जरांगे : 25 तारखेनंतर सरकारला आंदोलन पेलणार नाही, 48 तासांचा अल्टिमेटम

रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (16:52 IST)
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
24 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर 25 तारखेनंतर सरकारला ‘पेलणार’ नाही, असं आंदोलन करू, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली.
 
जालन्यातील अंतरवाली सराटी या आपल्या मूळ गावी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंनी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली.
 
जरांगेंचं पुढचं आंदोलन कसं असेल?
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मराठा समाजाकडून सरकारनं जो आरक्षण देण्यासाठी वेळ घेतला होता, त्याबाबत आम्ही आमच्या पुढील आंदोलनाची दिशा आज स्पष्ट करत आहोत, असं म्हणत जरांगेंनी पुढील आंदोलनाची रुपरेखा पत्रकार परिषदेतून मांडली.
 
जरांगेंनी सांगितलं की, “24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर 25 तारखेपासून मी माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आमरण उपोषणाला पुन्हा सुरू करणार आहे. ना कुठले उपचार घेणार, ना वैद्यकीय सेवा घेणार, ना अन्न-पाणी घेणार, एकदम कठोर उपोषण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करणार.”
 
तसंच, 25 तारखेपासून महाराष्ट्रभरातही साखळी उपोषण सुरू केलं जाणार असून, 28 तारखेपासून तेच साखळी उपोषण आमरण उपोषणात रुपांतरित होईल, असं जरांगे म्हणाले. मराठा समाजानं याची तयारी केल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.
 
“सरकारनं ही गोष्ट गांभीर्यानं घ्यावी, हे आमरण उपोषण आणि साखळी उपोषण महाराष्ट्रातले 5 कोटी मराठे चालवणार आहेत. सरकारसाठी सोपं असेल, पण उपोषण सुरू झाल्यावर तुम्हाला झेपणार नाही. ऐकताना हे सहज दिसत असेल, पण हे शांततेत जरी होणार असलं, तरी 25 तारखेला पुढची दिशा जाहीर केल्यावर तुम्हाला पेलणार नाही,” असं जरांगे म्हणाले.
 
गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी
जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कुठल्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावाला शिवूही देणार नाही.”
 
मात्र, नेमक्या कोणत्या पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ दिलं जाणार नाही, असा प्रश्न विचारल्यावर जरांगे म्हणाले की, “कायद्याच्या पदाव बसलेल्या लोकांनी आमच्या गावात येऊच नये. ओबीसीत समावेश केलेला जीआर घेऊन या. तो जीआर टिकलासुद्धा पाहिजे. तरच तो मान्य असेल.”
 
शांततेचं आंदोलन आहे. कुणी नेता आमच्या गावात आलाच, तर त्याला 'शांततेतच ढकलून' लावणार, असंही जरांगे म्हणाले.
 
सरकारनं 30 दिवस मागितले, मराठा समाजानं 40 दिवस दिले. आता आमचा आदर राखा, असंही जरांगे म्हणाले.
 
मनोज जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी
बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यात असणारं मातोरी हे जरांगे पाटील यांचं मूळ गाव. त्या गावात मनोज पाटील यांची छोटी शेती आहे.
 
तिथे जमीन असल्यामुळे ते त्यांची सासरवाडी असलेल्या अंकुशनगर येथे आले. तिथे त्यांची चार एकर जमीन होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी त्यातली दोन एकर जमीन विकल्याची माहिती आहे. गेल्या 12 ते15 वर्षांपासून ते अंबडजवळ असणाऱ्या अंकुशनगर येथे राहतात.
 
जरांगे पाटलांचं बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असून त्यांनी जालना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं केलेली आहेत.
 
मनोज पाटील यांच्या कुटुंबामध्ये पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील आहेत. सुरुवातीला कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केलं असल्याची माहिती माध्यमांनी दिलेली आहे.
 
यापूर्वी त्यांनी कुठे आंदोलनं केली आहेत?
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार 2014 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केल्या गेलेल्या अनेक आंदोलनांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सहभाग नोंदवला होता.
 
एवढंच नाही तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर देखील अनेक आंदोलनं केलेली होती मात्र त्यांच्या या आंदोलनांना मोठा पाठिंबा मिळालेला दिसला नाही.
 
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून झाल्याचं माध्यमांनी सांगितलंय. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवबा संघटनेची स्थापना केली आणि जालना जिल्ह्यामध्ये या प्रश्नावर मराठा तरुणांना एकत्रित आणण्याचं काम सुरु केलं.
 
नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता.
 
2014मध्ये त्यांनी शहागड ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगरमध्ये काढलेला मोर्चाही गाजला होता.
 
त्यांनी ज्या ज्या गावात आंदोलनं केली त्या त्या गावांमध्ये राहणारे लोक त्या आंदोलनात सहभागी होत असत. 2021मध्ये जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगाव या गावात मनोज जरांगे पाटील यांनी तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं.
 
त्याच आंदोलनात त्यांनी सहा दिवस उपोषणही केलं होतं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती.
 
साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी केलेल्या आंदोलनाची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. वडीकाळ्या आणि भांबेरी या गावात त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती.
 
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी अंतरवली येथे त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते.
 
आंदोलकांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते.
 
उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली.
पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर पोलिसांवरही दगडफेक केल्याचे आरोप आंदोलकांवर लावण्यात आले.
 
आंदोलनाविषयी विचारल्यावर जरांगे म्हणाले, “3 महिन्यात मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊ, असं सरकारनं आश्वासन दिलं होतं. 3 महिने उलटून गेले पण आरक्षणासाठीच्या समितीनं काही काम केलं नाही. आरक्षण घेईपर्यंत आम्ही हलणार नाही.”
 
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी लाठी चार्जनंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांना 1 सप्टेंबरच्या घटनेबद्दल विचारलं होतं.
 
त्यांनी सांगितलं, “सरकारकडून आमच्यावर खूप मोठा हल्ला करण्यात आला. गोळीबार करण्यात आला. आमच्या गावातले खूप लोक त्यात जखमी झाले. आमच्या लोकांची डोकी फोडून त्यांना काय मिळालं माहिती नाही. आमचं आंदोलन ते मोडीत करायला निघाले, पण आज महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आमच्या पाठीशी उभा राहिलाय.”
 
पण, गावकऱ्यांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं म्हटलं जात आहे, असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं, “लोकांनी पोलिसांना हाणलं असं गृहमंत्री सांगत आहेत. पण पोलिसांनी आमचे लोक दांड्याखाली तुडवलेत.”
 
मराठा आरक्षणाचा अध्यादेश हवा, गावकऱ्यांवरील पोलिस केसेस माघारी घेतल्या पाहिजेत आणि गावात आलेले सगळे पोलिस कर्मचारी बडतर्फ केले पाहिजे, या 3 प्रमुख मागण्यांसह मराठा आरक्षणासाठीचं उपोषण सुरुच ठेवणार असल्याचंही जरांगे यांनी तेव्हा म्हटलं होतं.
 












Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती