दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 3 ते 4 दिवस विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील विविध भागात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले तरी, फारसा पाऊस पडत नाही. परिणामी, या भागातील शेतकरी पेरणीसाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. काही भागात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत चालले आहे.
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्याच्या पश्चिम भागात ढगांची घनता वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.