लोकशाहीची दहिहंडी आहे का? दिसली हंडी की फोड अशी सरकारं फोडत आहेत- उद्धव ठाकरे

सोमवार, 17 एप्रिल 2023 (08:22 IST)
लोकशाहीची दहिहंडी आहे का? दिसली हंडी की फोड अशी सरकार फोडत आहेत. सत्ता पाहिजे ना, आम्ही देतो सत्ता. 8 वर्षात देशासाठी काय केलं ते सांगा. गद्दारांना घेऊन सरकार चालवता असं उद्धव ठाकरे म्हणाले. नागपुरात महाविकास आघाडीतर्फे वज्रमूठ सभेत उद्धव बोलत होते. उद्धव यांच्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विजय वडेवट्टीवार तसंच अन्य नेत्यांची भाषणं झाली.
 
भाजपचं हिंदुत्व गोमूत्रधारी
"काँग्रेसबरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असा आरोप होतो. संघाला विचारायचं आहे की तुमचं आणि भाजपचं चाललंय काय? आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. संभाजीनगरला सभा झाली, त्यांनी गोमूत्र शिंपडलं", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी आहे. जग कुठे चाललंय, यांचं काय चाललंय. तिथेही मुसलमान आलेले, इथेही मुसलमान आलेले. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. मी गेलो असतो तर? उत्तर प्रदेशात मदरशात जाऊन कव्वाली गाणार. जो जीव द्यायला तयार आहे तो हिंदू आहे. 2014 साली भाजपने युती तोडली होती. वचन तुम्ही मोडलंत. हे हिंदुत्व नाही".
 
"एका महिलेवर गुंडांकरवी हल्ला होतो. हात जोडून सांगतेय की मातृत्वासाठी उपचार घेतेय. मारु नका. माफी मागायचा व्हीडिओ केला. पोटावर लाथा मारल्या. हे हिंदुत्व. पोलीस तक्रार घ्यायला तयार नाहीत. तिला अटक करण्यासाठी खोलीबाहेर पोलीस बसले आहेत. त्या महिलेच्या डोळ्यात पाणी होतं. तिच्यावर एफआयआर. गृहमंत्री फडतूस आहे की नाही? दुसरा काय शब्द वापरणार? फडतूस म्हणजे बिनकामाचा. काय हे हिंदुत्व, काय हा कारभार- संघाला मान्य आहे का, विश्वगुरु मोदींना मान्य आहे का? गृहमंत्र्यांना मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
 
'हे अवकाळी सरकार आहे'
 
"व्यसन हे वाईटच. सत्तेची नशा चढली आहे. आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग सत्तेत बसलेल्यांचं मतदार होण्यासाठी उपयोग आहे. यांचा मित्राचा क्रम जगातील श्रीमंत लोकांमध्ये वाढत चालला आहे. देशाचा क्रमांक खाली खाली जात आहे.
 
परवाकडे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. माणसाला माणूसपणाचा अधिकार मिळवून दिला. बाबासाहेबांनी देशाला घटना दिली. भारतमातेच्या पायात बेड्या घालण्याचं काम केलं", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
"सव्वाशे कोटींचा देश आहे. एका माणसाने संविधान लिहिलं. ही वज्रमूठ एका माणसाने लिहिलेल्या घटनेचं रक्षण करू शकत नाही का? घटना बचाव नेभळटपणाचं वाटतं. घटना रक्षण मीच करणार हे मी सांगू इच्छितो. डोळ्यादेखत सगळं घडतंय. हल्ली शब्द जपून वापरतो. फडतूस बोलण्यामागचा उद्देश काय होता. शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्ही जाणता. उलट्या पायाचं सरकार आल्यानंतर गारपीट होते आहे. आजच्या सभेचं वेगळेपण- आम्हाला फसवलं म्हणून एकत्र आलो. आम्ही सरकार म्हणून काम करुन दाखवलंय, मग सभा घेतोय. जर आमचं सरकार नालायक असतं तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला नसतात. सरकार ज्यापद्धतीने गद्दारी करून पाडलं, पाठीत खंजीर खुपसून पाडलं. समोरासमोरा भिडणारा महाराष्ट्र आहे. वार करु तर छातीवर करु अशी शिवाजी महाराजांची शिकवण आहे. हे अवकाळी सरकार आहे".
 
धमन्यात हिंदुत्व असतं तर गुवाहाटीला गेले नसते, अयोध्येला गेले असते
"राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात होता. थंड बस्त्यात होता. सुरुवात शिवसेनेने केली. पहले मंदिर, फिर सरकार. मोदींना सांगत होतो की तुमचं सरकार आहे. आम्हाला म्हणाले, आता काही बोलू नका. न्यायालयाने निकाल दिला. मग हे टिकोजीराव फणा काढून बसले. आम्हीच सगळं केलं म्हणून सांगत आहेत. आता कुणीही जाऊ शकतं. रामभक्त असते तर पहिले सुरतला गेले नसते, अयोध्येला गेले असते. यांच्या धमन्यात हिंदुत्व असतं तर गुवाहाटीला गेले नसते, अयोध्येला गेले असते. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस अयोध्येला गेले नाहीत. नळाबरोबर गाड्याची यात्रा. रामाच्या दर्शनाला गेल्यावर रामराज्याला विसरु नका. शेतकरी टाहो फोडत आहेत, आक्रोश करत आहेत. पंचनामा करायला सुद्धा सरकारी अधिकारी वेळेवर जात नाहीत. आम्ही कमीत कमी वेळेत शेतकऱ्याला मदत पोहोचवली होती. आता शेतकरी जे बोलत आहेत त्याचं काय. हे शेतकऱ्याच्या मयताला जातील", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत असं सांगतात. घरात बसून कारभार करत होतो पण राज्याचा देशात पाचवा क्रमांक होता. काम कुठूनही करता येतं. नुसतं फिरला म्हणजे काम होत नाही. जनतेला जे पाहिजे ते देत नाहीत. महागाई वाढत चालली आहे. एअरबस गुजरातमध्ये गेली कारण केंद्रातून सिग्नल मिळाला".
 
तेव्हा तुम्ही आणि तुमचे काका गेला होतात का? चंद्रकांत पाटलांना सवाल
"शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला. बाप चोरणारी औलाद तुमची, जनतेला मुलासारखं काय सांभाळणार? शिवसेना नाव नेलंत, धनुष्य नेलंत. चंद्रकांत पाटील बोलले. तेव्हा तुम्ही आणि तुमचे काका गेला होतात का? जे चंद्रकांत पाटील बोलले ते संघाच्या लोकांना पटतंय का? बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. मी शिवसेनाप्रमुखांचं नाव घेऊन मैदानात उतरतो. तुम्हाला तुमचा बाप निवडायचा आहे. जर मर्द असाल तर मैदानात या. मैदान मिळू नये म्हणून काड्या कशाला घालता? लोक जमलेत. जनता जनार्दन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
आनंदाचा शिधा मिळाला का? शिध्याला बुरशी लागलेय. कारभारालाच बुरशी लागलेय. आता जिंकेपर्यंत थांबायचं नाहीये. वज्रमूठ आवळून सांगा की आमच्याबरोबर आहात का असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
 
Published By- Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती