नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर काठावरील मंदिरे बुडाली, धरणातून पाण्याचा विसर्ग

सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (10:19 IST)
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंडाच्या काठावर बांधलेली मंदिरे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. तसेच सर्वसामान्यांनी गोदावरी नदीच्या काठावर जाऊ नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
 
नाशिक शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. रविवारपासून गंगापूर धरणातून सुमारे साडेआठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून रामकुंडावरील अनेक मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. तसेच गंगापूर धरणासह इतर धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिकचा पूरमापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
 
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरीतील हर्णै आणि पालघरमधील डहाणू येथे 116 मिमी आणि 143 मिमी पाऊस झाला आहे. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे 43 मिमी तर नांदेड व परभणी येथे 48 मिमी व 55 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
तसेच हवामान खात्याने महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती