ठाण्यात दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

सोमवार, 19 जुलै 2021 (18:16 IST)
ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात एका घरावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे. या दुर्घटनेत घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. बचाव पथकाने आतापर्यंत दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. ते जखमी अवस्थेत आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे.
 
नेमकं काय घडलं?
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पाऊस वैरी होऊन कोसळतोय. या मुसळधार पावसाने गेल्या 48 तासात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेकांचा बळी घेतला आहे. चेंबूरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना ताजी असताना अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती ठाण्याच्या कळवा शहरात झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरावर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. एका घरावर दरड कोसळल्याने ते घर नेस्ताबूत झालं. ज्या नागरिकांनी ही घटना पाहिली त्यांच्यासाठी हा थरार शब्दांमध्ये सांगण अशक्य आहे.
 
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून सुखरुप काढलं आहे. पण आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती