महाराष्ट्रातील बीड येथील न्यायालयाने जिल्हाधिकारी साहेबांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहे. गाडी जप्त केल्यानंतर, तिच्या लिलावासाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे.तसेच बीड येथील न्यायालयाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण शेतकऱ्यांशी संबंधित आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार बीडमधील माजलगाव येथील न्यायालयाने सिंचन प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या तीन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. वादीचे वकील म्हणाले की, १९९८ मध्ये वडवणी तहसीलमधील शेतकरी शिवाजी तोगे, संतोष तोगे आणि बाबू मोगे यांच्याकडून सिंचन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली होती. वकील म्हणाले की त्यांनी माजलगाव न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यांना देण्यात आलेली भरपाई अपुरी असल्याचा दावा केला होता. न्यायालयाने २९ ऑक्टोबर २०१५ च्या आदेशात भरपाई वाढवली होती. प्रशासनाने अद्याप एकूण २९.५० लाख रुपये भरणे बाकी असताना, रकमेचे केवळ अंशतः वितरण करण्यात आले.