फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रत्युत्तर

बुधवार, 24 मार्च 2021 (21:13 IST)
भाजप आणि अन्य पक्ष महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधत आहेत. देवेंद्र फडणवीस  यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सगळं विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं, असं नाना पटोले म्हणाले. 
 
नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे. काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे, असे म्हटले होते. यावर, या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचे सांगत असतील, तर फडणवीस सरकारमध्ये झालेली पापं राज्य सरकारने उघड करावीत. परमबीर सिंग कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती, असा पलटवार नाना पटोले यांनी केला. 
 
आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं आहे. वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती