सोमवारी सकाळी ठाण्यातील मध्य रेल्वे मार्गावर दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना भरपाईची घोषणा केली. ठाणे जिल्ह्यातील मुंब्राजवळ झालेल्या उपनगरीय रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई देईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
या अपघातात सरकारी रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) एका कॉन्स्टेबलसह किमान चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि नऊ जण गंभीर जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन गर्दीच्या गाड्यांच्या फूटबोर्डवर लटकलेल्या प्रवाशांसह त्यांच्या बॅगा एकमेकांवर आदळल्या. या धडकेमुळे प्रवासी ट्रेनमधून पडले असावेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल आणि त्यांना चांगले उपचार देईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अपघातस्थळी पत्रकारांना गिरीश महाजन म्हणाले, "या अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार पाच लाख रुपयांची मदत देईल. जखमींनाही आर्थिक मदत दिली जाईल