आमिरवर शिवसेनेचा हल्ला

गुरूवार, 26 नोव्हेंबर 2015 (10:32 IST)
मुंबई- असहिष्णुता वाढल्याचा दावा करून देश सोडण्याचे वक्तव्य करणार्‍या अभिनेता आमिर खानवर शिवसेनेने टीकेचा भडिमार केला आहे. आमिर खानला बाईलबुद्ध्या, इडियट, रणछोडदास, बेइमान, पळपुट्या अशा शेलक्या शब्दात हिणवतानाच, ‘देश सोडून जायला तुझ्यावर असे कोणते संकट कोसळले आहे हे तरी कळू दे,’ असा संतप्त सवाल शिवसेनेने आमिरला केला आहे.
 
आमिरच्या असहिष्णुतेच्या तक्रारीवर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवला आहे. देश सोडून जाण्याची आमिरची भाषा बेइमानीची आहे. ज्याला हा देश आपला वाटत नाही त्याने उगाच देशभक्तीच्या व ‘सत्यमेव जयते’च्या वल्गना करू नयेत, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.
 
शिवसेना म्हणते..आमिरला कोणत्या कारणांमुळे देशातून पळून जावेसे वाटले व या बाईलबुद्ध्याने ‘मातृभूमीस’ टांग मारून फिल्मी बायकोचे सांगणे इतके मनावर का घ्यावे हे त्याचे त्यालाच माहीत. या वक्तव्याने त्याच्या ‘सत्यमेव जयते’चा मुखवटा साफ गळून पडला आहे व देशभक्तीचा फुगा फुटला आहे. देश संकटात असताना येथे ठामपणे उभे राहण्याचे सोडून सिनेमातील ही ‘खान’ जमात पळून जायची भाषा करते, पण मुळात या पळपुट्यावर असे कोणते संकट कोसळले आहे ते तरी कळू द्या.
 

वेबदुनिया वर वाचा